जिल्हा सामान्य रुग्णालय येथे
जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन साजरा
चंद्रपूर, दि. 20 जून: राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमातंर्गत 19 जून जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनाचे निमित्याने सिकलसेल रुग्णांच्या व्यथा व अपेक्षा या विषयावर पोस्टर प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन सामान्य रुग्णालय व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे, अधिपरिचारीका जिल्हा रुग्णालय माया आत्राम,जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या श्रीमती कळसंगे, उपअभियंता निलेश खाडे, धिरज कासर्लेवार, जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेशवार, समुपदेशक भारती तितरे तसेच परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थीनी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सिकलसेल आजार हा अनुवंशीक असल्यामुळे या आजारातुन कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडिल जबाबदार असतात. परंतु या आजाराच्या नियंत्रणाकरीता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकलसेल तपासणी करून घेणे गरजेचे आहे. यामुळे पुढील पिढीत हा आजार टाळता येतो. वाहक-वाहक व्यक्ती तसेच वाहक- ग्रस्त व्यक्ती मध्ये लग्न करु नये.
सिकलसेल रुग्णांमध्ये वेळोवेळी हातपाय दुखणे, चक्कर येणे, नेहमी आजारी पडणे जंतुसंसर्ग होणे, अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराच्या रुग्णाने भरपूर पाणी पिणे, भरपूर आहार घेणे, व नियमित फोलिक अॅसिड गोळयांचे सेवन करणे, महत्त्वाचे असते. या आजाराच्या रुग्णांनी योग्य काळजी न घेतल्यास आजारी पडून मृत्यु होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार, आरोग्य तपासणी करणे व काळजी घेणे गरजेचे असते.
सिकलसेल रुग्णांकरीता ( मोफत रक्तपुरवठा व उपचार, संजय गांधी निराधार योजनेतंर्गत रु.800 ची मदत, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, सिकलसेल ग्रस्त विद्यार्थ्यांना परिक्षेच्या वेळी एका तासाला 20 मिनिटे जास्त वेळेची सवलत, उपचारा दरम्यान सिकलसेल रुग्ण व त्याच्या एका मदतनिसास मोफत एस.टी. प्रवास सुविधा, सिकलसेल ग्रस्त रुग्णांचा दिव्यांगामध्ये समावेश असुन सर्व सिकलसेल ग्रस्त व्यक्तींना कमीतकमी 40 टक्के दिव्यांगाचे प्रमाणपत्र या कार्यालयामार्फत देण्यात येत आहे इ.) शासनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. सदर सुविधांचा लाभ प्रत्येक सिकलसेल ग्रस्त रुग्णांनी घ्यावा.
सदयस्थितीत जिल्ह्यांतर्गत कोरोना विषाणूची साथ चालू असल्याने सिकलसेल रुग्णांनी हात दर दोन तासांनी सॅनीटाइज करावे. तसेच चेहऱ्यावर मास्क असणे बंधनकारक आहे. आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे अंतराचे पालन काटेकोरपणे करावे.
आज पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 19 लाख 85 हजार 204 व्यक्तींची सिकलसेल तपासणी झालेली असुन 2 हजार 702 व्यक्ती सिकलसेल रुग्ण तर 31 हजार 731 व्यक्ती सिकलसेलचे वाहक आढळून आलेले आहेत. सदर कार्यक्रमातंर्गत 1 ते 30 वर्ष वयोगटातील मुलामुलींची तसेच गर्भवती मातांची तपासणी करण्यात येत असुन तपासणीमध्ये सकारात्मक चाचणी आल्यास त्या कुटुंबातील
सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येते. या आजाराच्या नियंत्रणाकरीता प्रत्येक व्यक्तीला सिकलसेल आजाराची माहिती व सिकलसेल रुग्णांना या आजाराची जाणीव होणे हीच खरी सिकलसेल रुग्णांसाठी औषध आहे. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व गावात जनजागृती करुन सर्वच शासकीय आरोग्य संस्थेत मोफत सिकलसेल चाचणी करण्यात येत आहे.
याकरीता प्रत्येक व्यक्तींनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची मोफत सिकलसेल तपासणी करुन सिकलसेल ग्रस्त आहोत, वाहक आहोत कि आपल्याला सिकलसेल नाही याबाबत खात्री करुन घ्यावी. विवाहपूर्वी प्रत्येक मुलामुलींनी सिकलसेल तपासणी करुन लग्न केल्यास निश्चितच या आजारावर नियंत्रण शक्य आहे. समाजातील इतर व्यक्तींना सुध्दा सिकलसेल चाचणी करण्यास प्रोत्साहित करुन या आजाराची माहिती जनसामान्यांना करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे नेतृत्वात कार्य करण्याचे मनोगत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सिकलसेल दिनानिमित्य व्यक्त केले.
00000
No comments:
Post a Comment