गाव, मोहल्ला, शहर, वार्ड, प्रत्येक ठिकाणी
नागरिकांनी प्रशासनाचे कान डोळे व्हा : जिल्हाधिकारी
Ø जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø 56 ठिकाणी पोलिसांची कडेकोट नाकेबंदी
Ø ग्रामसुरक्षा दल व नागरिकांनी गावे सील करावी
Ø अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही निर्बंध
Ø पुरवठा व्यवस्थेतून प्रत्येकाला मिळेल न्याय
Ø पशुखाद्य विक्री सुरू , ग्रामोद्योगांना परवानगी
Ø शेतीच्या कोणत्याही कामावर बंधने नाहीत
Ø महानगरांमध्ये मोठ्याप्रमाणात निर्जंतुकीकरणाला सुरुवात
Ø शहरातील अनेक रस्ते बॅरिकेट्स लावून बंद
चंद्रपूर, दि.15 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. चंद्रपूर जिल्हा देशभरात ग्रीन झोन मध्ये आला आहे. मात्र अद्यापही धोका टळला नसून आरोग्य विभाग प्रत्येक नागरिकांची तपासणी करत आहे. सोबतच नवीन येणाऱ्या प्रत्येकाला तपासणी करूनच आतमध्ये घेतले जात आहे. मात्र यापुढे चंद्रपूरमध्ये कोणी येऊ नये व चंद्रपूर मधून कोणीही बाहेर जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश आज जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडिओ संवाद साधतांना लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये सध्या आहे. मात्र गावागावांमध्ये आशा वर्कर कडून येणाऱ्या आकडेवाडीरीमधून, महानगरपालिका व पोलिसांकडून येणाऱ्या आकडेवारीतून अनेक जण चंद्रपूरमध्ये हे नव्याने दाखल होत असल्याचे दिसून येते. यापुढे शासकीय कर्मचाऱ्यांसह अन्य कोणालाही अप-डाऊनची परवानगी नाही. चंद्रपूरमध्ये कोणालाही येता येणार नाही व कोणालाही बाहेर पडता येणार नाही. अपवादात्मक स्थितीमध्ये पोलिसांची परवानगी घेऊनच शहरात तपासणीअंती दाखल होता येईल. प्रत्येकाची तपासणी आवश्यक आहे. नव्याने येणाऱ्या आजारी व्यक्तीला कॉरेन्टाइन करण्याची थेट कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
चंद्रपूर शहरांमध्ये अतिशय उत्तम अशी नाकेबंदी आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. शहरातील अनेक छोटे रस्ते बंद करण्यात आले आहे. ही नागरिकांची गैरसोय नसून कोरोना सारख्या महामारी सोबत लढण्यासाठी उचलण्यात आलेले सक्त पावले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. येणाऱ्या भाजीपाल्याचे ट्रक सुद्धा निर्जंतुकीकरण करूनच शहरात घेण्यात येत आहे. प्रत्येक नाक्यावर काळजी घेणे आवश्यक असून जिल्ह्याच्या प्रमुख 56 ठिकाणांवर पोलिसांचा 24 तास जागता पहारा आहे. मात्र अशावेळी सीमावर्ती गावांमधील नागरिकांनी प्रशासनाचे कान व डोळे होणे आवश्यक आहे. राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात अतिशय कडक कारवाई केली असून लगतच्या तेलंगाना मधून येणाऱ्या नागरिकांना मज्जाव केला आहे. काहींना काल सीमेवरून परत पाठविण्यात आले आहे. यापुढेही पोलिसांची परवानगी असेल तरच आतमध्ये घेतल्या जाईल. या जिल्ह्यात असणाऱ्या सर्व बाहेरच्या नागरिकांची आम्ही काळजी घेत आहोत. त्याप्रमाणे सीमेलगतच्या असिफाबाद, आदीलाबाद, यवतमाळ ,नागपूर याठिकाणी अडकल्याची देखील काळजी तेथे घेतली जात आहे. त्यामुळे 3 मे पर्यंत कोणीही येण्याची व आतून बाहेर जाण्याची हिम्मत करू नये, असे स्पष्ट केले आहे.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसार कुंभार समाजाला त्यांची नियमित पारंपारिक कामे करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहेत. तसेच शहर व जिल्ह्यातील पशुखाद्य विक्री केंद्र उघडण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहे. शेतीच्या नियमित कामाला कोणतेही बंधन टाकण्यात आले नाही. जीवनावश्यक वस्तू दुकाने सकाळी 7 ते 2 पर्यंत कायम उघडे असतील. 20 तारखे नंतर रेशन दुकानांमधून किराणा वाटपाला देखील सुरुवात होणार आहे. सध्या रेशन दुकानातून 2 व 3 रुपये दराने गहू व तांदूळ मिळत आहेत. याशिवाय प्रत्येक मानसी 5 किलो तांदूळ मोफत मिळत आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व बँका सुरळीत सुरू असून नागरिकांनी आपल्या गावातील सेतू केंद्रांमध्ये बँकेचे व्यवहार आधार कार्ड दाखवून करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. डीजीपे सुविधाद्वारे सेतू केंद्रातून व पोस्ट कार्यालयातून देखील बँकेचे व्यवहार नागरिकांना यापुढे करता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाणे गरजेचे नसून सर्व बँका देखील सुरु ठेवण्यात आलेल्या आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 67 नागरिकांची नोंद करण्यात आली. 59 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 39 नमुनेही निगेटिव्ह निघाले आहेत. 20 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 27 हजार 662 आहे. यापैकी 2 हजार 859 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 24 हजार 803 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 49 आहे.
नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या 07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment