कोरोनाच्या संकटात कृषी निविष्ठा पुरवठ्यासाठी विभागाचा सल्ला
चंद्रपूर,दि.29 एप्रिल: कृषि विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी ग्राम पातळीवर समन्वयक म्हणून काम केल्यास कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट यांचे माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे शेतावर बी-बियाणे, खते, अवजारे, औषधे (कृषी निविष्ठा) पुरवठा करणे शक्य आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी दिली आहे.
खरीप हंगाम 2020 सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशके यांचा पुरवठा वेळेमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या पाश्वभुमीवर सर्व जिल्ह्यामध्ये संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावर येऊन बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते आणि फिजीकल डिस्टन्सिंग न पाळले गेल्यामुळे कोरोना विषाणूंचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे जसे शेतकरी गटांमार्फत भाजीपाल्याचा पुरवठा शहरांमध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने करण्यात आला त्याच धर्तीवर कृषि निविष्ठांचा पुरवठा कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपणी यांचा समन्वय करावयाचा आहे. ग्रामपातळीवर शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
शेतक-यांनी त्यांच्या भागात असलेल्या आणि त्यांना सोयीच्या गटांकडे त्यांची नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करून घेतांना आत्मा अंतर्गत ज्या गटांची नोंदणी झालेली आहे.त्याच गटांकडे नोंदणी होईल असे पाहावे.त्यानिमित्ताने 100 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी कोणत्या ना कोणत्या गटाकडे करणे शक्य होईल.
शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, पत्ता, सर्वे नंबर/गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, त्यांना ज्या कृषि सेवा केंद्रामधुन निविष्ठा खरेदी करावयाच्या आहेत. त्यांच्या नावासह, त्यांना खरीप हंगामामध्ये आवश्यक असणारे विविध पिकांचे बियाणे, खते, किटकनाशके यांची मागणी गटाकडे करावी.
क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्पादक शेतकऱ्यांचे गट पिकनिहाय तयार करून शेतकऱ्यांना गटाव्दारे आवश्यक बियाणे नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. ही सर्व कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी समन्वयक म्हणून करावी.
निविष्ठांची नोंदणी गटांकडे झाल्यानंतर गटप्रमुखानेच बियाणे/खते/किटकनाशके खरेदी करावी. जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना विक्री केंद्रावर जावे लागणार नाही.
ज्या विक्रेत्यांना शक्य आहे. अशा विक्रेत्यांनी मोबाईल अॅप तयार करून शेतकऱ्यांची मागणी नोंदवून घ्यावी आणि मोठी मागणी असल्यास मागणीप्रमाणे बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहच करावेत.
कृषि सेवा केंद्र ते शेतकरी गट या वाहतूकी करीता कृषि व आत्मा विभागाच्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी समन्वयक म्हणून काम करावे. या वाहतुकीकरीता आवश्यक असणारे परवाने संबंधित तालुका कृषि अधिकारी यांनी गटांकरीता उपलब्ध करून दयावेत.
मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक किंवा कृषि सहाय्यक व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) यांचे मार्फत व्हिडीओ कॉलव्दारे शेतकरी आणि कृषि निविष्ठा विक्रेता यांचा समन्वय घडवुन आणावा जेणेकरून सदर निविष्ठा खरेदी व्यवहारामध्ये पारदर्शकता राहुन शेतकऱ्यांची फसवणुक होणार नाही. शेतकऱ्यांनी त्यांना हव्या असलेल्या आणि वाजवी दरामध्ये निविष्ठांचा पुरवठा करणाऱ्या निविष्ठा विक्रेत्याकडुन निविष्ठा खरेदी करण्यासाठी नोंदणी करावी.
शेतकरी व निविष्ठा विक्रेता यामधील आर्थिक बाबी शेतकरी गटामार्फत पारदर्शक पध्दतीने हाताळण्यात याव्यात. या करीता कृषि विभागाच्या अधिकाऱ्याने मार्गदर्शन करावे.
निविष्ठा पुरवठ्याबाबत तालुका स्तरावर कालबध्द कार्यक्रम आखण्यात येत आहे. दिनांक 31 मे 2020 पुर्वी अथवा पेरणी हंगाम सुरू होण्यापुर्वी शेतकऱ्यांना सर्व निविष्ठांचा पुरवठा होईल असे नियोजन करण्यात येत आहे.
00000
No comments:
Post a Comment