जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याकडून नियोजन
चंद्रपूर, दि.11 एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सरकारी, खासगी शाळांना शासनाने सुट्टी जाहीर केली आहे.अव्वर सचिव,शालेय शिक्षण विभाग, मुंबई यांनी विद्यार्थ्यांचे गृह शिक्षणाबाबत आढावा घेतला.राज्यस्तरावरून विद्यार्थ्यांचे गृह अभ्यास संबंधाने काही निवडक उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा घरच्या घरी अभ्यास करता यावा यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांचे मार्फत विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.हे नियोजन प्रथमतः 30 दिवसांसाठी करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.
असे असणार नियोजन:
या विशेष कार्यक्रमाच्या पूर्वतयारीमध्ये प्रथमता गुगल फॉर्म च्या माध्यमातून जिल्ह्यातील या उपक्रमासाठी इच्छुक शिक्षक, साधन व्यक्ती,अधिकारी यांची यादी तयार करणे, संकलित केलेल्या यादीतील प्रत्येक तालुक्यातून 5 सदस्यांची निवड करणे. म्हणजेच 75 सदस्य जिल्ह्यासाठी असणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी डायट फॅकल्टी मधून एकाची नियंत्रक म्हणून निवड करणे.स्टडी फ्रॉम होम या उपक्रमांची कार्यवाही नियुक्त सदस्यांना झूम ॲप द्वारे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या उपस्थितीत प्राचार्य, डीआयईटी यांना समजावून सांगणे. प्रथम टप्प्यात इयत्ता पहिली ते पाचवीसाठी उपक्रम घेणे नियोजित आहे.
अशी असणार प्रत्यक्ष कार्यवाही:
टीचर टास्क फोर्स नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार करणे. इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्ययन अनुभव देणारा 3 मिनिटांचा एक व्हिडिओ तयार करणे. सोमवार ते शुक्रवार जिल्ह्यातील विविध व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत व त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचविणे. दररोज किमान 2 विषयाचे व्हिडिओ इयत्तानिहाय (पहिली ते पाचवी) तयार करणे. सोमवार ते शुक्रवार पर्यंत झालेल्या अभ्यासावर शनिवारला चाचणी घेणे. जिल्हास्तरावरील टीचर टास्क फोर्स प्रमाणे तालुका व केंद्रस्तरावर व्हाट्सअप ग्रुप तयार करणे.
असा होणार उपक्रमाचा प्रसार व प्रचार:
जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचावा यासाठी व्हाट्सअप, फेसबुक,फेसबुक लाईव्ह, युट्यूब, वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे यांची मदत घेतली जाणार आहे.
विद्यार्थ्यांचा गृह अभ्यास बाबत शिक्षकांनी पालकांचे व्हाट्सअप शैक्षणिक गृप करावे. शिक्षक योग्य वेळ निर्धारीत करुन मुलांना संपर्क करण्यास सांगीतल्यास विदयार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. शिक्षकांनी पालकांना फोन करु नये. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य घेता येईल.आपल्या कार्यक्षेत्रात मोबाईलद्वारे सुरु असलेल्या शैक्षणिक प्रक्रीयेची माहिती पाठवावी. त्यामुळे शिक्षण विभागला योग्य उपाययोजना करण्यास मदतच होईल. विदयार्थी,पालकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment