सोमवारपासून संजय गांधी योजनेतून अनुदान वाटपाला सुरुवात
Ø चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø 113 व्यक्ती संस्थात्मक कॉरेन्टाइन ;78 अहवाल निगेटिव्ह
Ø केशरी शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल करणे सुरू करावी
Ø शारीरिक दूरी पाळत शेतकरी, शेतमजूर यांनी कामे करावी
Ø बियाणे खतांसाठी कृषी केंद्र सकाळी 10 ते 5 सुरू राहतील
Ø मोबाईल रिचार्जची दुकाने सकाळी 7 ते 2 सुरू राहतील
Ø खरीप कर्ज वाटपासाठी स्टॅम्प पेपर बँकेतच मिळणार
Ø ट्रॅक्टर व कृषी अभियांत्रिकी संदर्भातील दुकाने सुरू
Ø धार्मिक, सण,उत्सवांमध्ये एकत्रीकरणाला मज्जाव
Ø मास्कचा वापर अनिवार्य, 200 रुपये दंड सुरू
चंद्रपूर, दि. 24 एप्रिल : महाराष्ट्रासह देशामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्ये असल्यामुळे गाफील न राहता पुढील आदेशापर्यंत गरज नसेल तर बाहेर पडू नका. जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे माहिती लपविल्याने, आदेश न पाळल्याने, स्वतःला व जिल्ह्याला धोक्यात घालू नका. प्रत्येक घराघरातून यासाठी प्रशासनाची साथ देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज जिल्हावासियांशी व्हिडिओ संवादाद्वारे संपर्क साधला. एक पॉझिटिव्ह रुग्ण शेकडो नागरिकांचे जीवन धोक्यात आणू शकतो. त्यामुळे अन्य शहरातून येणाऱ्या नागरिकांची माहिती न घाबरता प्रशासनाला द्या. तपासणी करून घ्या. घरातच रहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सोबतच खरीप हंगामासाठी आवश्यक सर्व उपाययोजना प्रशासनाने केल्या असून या वर्षी मान्सून नियमित असल्याने शेतकऱ्यांनी शारीरिक अंतर ठेवून खरीप पूर्व हंगामाची तयारी करावी. शेतकऱ्यांना शेतात करायच्या नियमित कामांमध्ये कोणताही अडथळा नाही. खते, बियाणे, याची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांना सकाळी 10 ते 5 सुरू राहण्याची परवानगी दिली आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असणारे पीक कर्ज घेण्यासाठी बँकेतच स्टॅम्प उपलब्ध करण्यात आले आहे. ट्रॅक्टर व शेती अवजारे दुरुस्त करणाऱ्या सर्व दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी शारीरिक अंतर ठेवत शेतीची सर्व कामे सुरू करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
तथापि, हे करीत असताना मास्कचा वापर करावा, हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, परस्परांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. धार्मिक, पारंपारिक, लग्न, तेरवी, वाढदिवस, सण-उत्सव यात गर्दी होणारच नाही, असे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान सर्व तालुक्यांना आज जमा झाले आहे. जिल्ह्यातील 9 हजार लाभार्थ्यांना सोमवारपासून याचा लाभ मिळणार आहे. मात्र बँकेत यासाठी एकाच वेळी झुंबड करू नये. गावातील आपले सरकार सेतू केंद्र व बँकेमध्ये अंतर राखून व्यवहार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोबाईल रिचार्जची दुकाने सुरू करण्यात आली असून 7 ते 2 या काळात ती सुरू राहतील. जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकावर देखील अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. जिल्हयाच्या 21 लाखाच्या लोकसंख्येमध्ये 15 लाख लोकांपर्यंत अन्नधान्य सार्वजनिक वितरण प्रणालीतून पोहोचत आहे. मात्र, केशरी शिधापत्रिकाधारकांना मानसी 8 रुपये किलो दराने 3 किलो किलो गहू व प्रति व्यक्ती 12 रुपये किलो दराने 2 किलो तांदूळ वितरित केले जाणार आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांनी आपले अन्नधान्य रेशन दुकानातून उचलावे. केशरी शिधापत्रिकाधारकांना हे अन्नधान्य मोफत नाही.
चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये मास्कचा वापर अनिवार्य आहे. अन्यथा 200 रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये अडकून पडलेल्या आपल्या नातेवाईक व कौटुंबिक सदस्यांना 3 मेपर्यंत जिल्ह्यात येऊ नये, असा संदेश द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 90 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील 82 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 78 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 4 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 31 हजार 411 आहे. यापैकी 2 हजार 544 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 28 हजार 867 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 113 आहे.
संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील 229 प्रकरणात एकूण 12 लाख 74 हजार 770 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या 58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 739 वाहने जप्त केली आहेत.प्रशासनाने जारी केलेले नियम व सुचनांचे उल्लंघन केले तर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी कम्युनिटी किचन, जेवणाची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता व सामान्य चौकशीसाठी महानगरपालिकेच्या 07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी माहिती इत्यादींसाठी 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता व सामान्य चौकशीसाठी 07172-251597, तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावरसुध्दा चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment