Ø आवश्यक सुरक्षा पास तालुका अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून देण्याचे निर्देश
चंद्रपूर दि. 23 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी बांधबंदिस्ती, नांगरणी, वखरणीच्या कामाला सामाजिक अंतर राखून सुरुवात करावी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु ठेवत आपली कामे सुरू करावीत,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज झालेल्या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष जाधव उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यांमध्ये बियाणे, खते, औषधी, ट्रॅक्टर,अवजारे, विक्री, दुरुस्ती, आदी संदर्भातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने खुली करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करीत ही प्रतिष्ठाने सुरु करण्यात यावी,असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात वाहतूक करण्यासाठी, दुकानदार व आवश्यक कर्मचारी यांना तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, यांनी आवश्यक त्या पासेस उपलब्ध करून देण्याचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पोलीस विभागांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पासेसला ग्राहय धरावे, असे स्पष्ट केले आहे.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक असणारे सर्व बांधकामे जिल्हा अंतर्गत सुरू ठेवावीत. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला कार्यकारी अभियंत्यांनी तसेच उपलब्ध करून द्याव्यात, असे देखील स्पष्ट करण्यात आले. बाबतही पोलीस विभागाला अवगत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मात्र, कोरोना आजाराचा प्रसार होणार नाही. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अटी शर्ती या काळात संबंधित यंत्रणेने पाळाव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही:
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 89 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील 81 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 77 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 4 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 31 हजार 151 आहे. यापैकी 2 हजार 609 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 28 हजार 542 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 118 आहे.
संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणा-यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील 217 प्रकरणात एकूण 12 लाख 45 हजार 470 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या 58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 729 वाहने जप्त केली आहेत.
प्रशासनाने जारी केलेले नियम व सुचनांचे उल्लंघन केले तर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी कम्युनिटी किचन, जेवणाची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता व सामान्य चौकशीसाठी महानगरपालिकेच्या 07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी माहिती इत्यादींसाठी 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता व सामान्य चौकशीसाठी 07172-251597, तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावरसुध्दा चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment