गरजवंतांची उपासमार होऊ नये म्हणून पालकमंत्र्याचा आधार
चंद्रपूर,दि.5 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंत, कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून ब्रम्हपुरीनंतर सावली व सिंदेवाहीतील गरजू, शेतमजूर, कष्टकरी, गरीब कुटुंबाना 15 दिवस पुरेल इतके अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडून रविवारी तहसिल कार्यालय सावली व सिंदेवाहीच्या परिसरात शुभारंभ करण्यात आले.
निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही.लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील स्थलांतरित कामगार, गरजवंत, हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत अन्न धान्य वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. नजरचुकीने कोणी राहिले असेल ज्यांना धान्य पॉकेट मिळालं नाही त्यांनी संपर्क साधा जिल्ह्यातील कुणाचीही उपासमार होऊ देणार नाही असे प्रतीपादन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले आहे.
पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या कडून सावली व सिंदेवाही तालुक्यातील गरजवतांना मोफत जीवनावश्यक वस्तू वाटपाच्या शुभारंभ प्रसंगी सावली येथे नगराध्यक्ष नगरपंचायत विलास यासलवर, सभापती पंचायत समिती विजय कोरेवर, तहसीलदार पी.के.कुमरे, सरपंच राजू सिद्धम, दिनेश चिटनूरवार, ठाणेदार बाळासाहेब खाडे, मुख्याधिकारी मंजुषा वाजळे तसेच सिंदेवाही येथे नगराध्यक्ष नगरपंचायत आशाताई गंडाते, सदस्य जिल्हा परिषद रमाकांत लोंढे, स्वप्नील कावळे, नरेंद्र भैसरे, अरुण कोलते, सिमताई साखरे, राहुल पोरेड्डीवार, विरेंद्र जैस्वाल उपस्थित होते. तर यावेळी दिव्या संघपाल दुधे, मालू बंडू मेदपल्लीवार, मीनाक्षी राऊत, शालू मेदपल्लीवार यांच्यासह 30 तर सिंदेवाही येथे जयप्रकाश बबन शेंडे, रोशनी चारसिंग ताक, शिफा स्लिम, सुरेश पस्तंवार यांच्यासह 30 लाभार्थ्यांना अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत गेले काही दिवस जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही, लहान व्यवसाय करणारे कारागीर व दुकानदार यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना घरीच बसून राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांची उपासमार होऊ नये, त्यांना पोटभर अन्न ऊपलब्ध व्हावे तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत अशाही गरजू लोकांना पोटभर अन्न मिळावे म्हणून पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील निराश्रितांना, गरजवंताना, विधवा,अपंग, भूमिहीन,मजूर यांच्या कुटुंबांना किमान 15 दिवस पुरेल एवढया जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देश वाचवण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. संपुर्ण लॉकडाउनमूळे वाहतूक थांबली ,कामधंदे मिळणे थांबले, जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता देशभरात इतर सर्व दुकाने बंद आहेत. एकुणच हातावर पोट असणाऱ्या आणि गोर- गरीब जनतेवर याचा पर्यायाने प्रतिकूल परिणाम होत आहे. मग ज्याचे हातावर पोट आहे ! त्यांचे काय? त्यांच्या घरात चूल कशी पेटणार अशा परिस्थीतीत त्यांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या मार्फत ब्रम्हपुरी नंतर आज सावली आणि सिंदेवाहीत आज(रविवारी) प्रती कुटूंब 10 किलो तांदूळ, 2 किलो तूर डाळ, 1 किलो खाद्य तेल, 200 ग्राम मिरची पावडर, 50 ग्राम हळद पावडर, 1 किलो मीठ, 1 साबण या जीवनावश्यक वस्तूचे किट मोफत वाटप करण्यात आले. वाटप करताना शासनाने लावलेल्या कलम 144 चे पालन करण्यात आले.
कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशापरीस्थितीत गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून लोकांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार करत आहेत.
00000
No comments:
Post a Comment