चंद्रपूर, दि.17 एप्रिल: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव होऊ नये याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने जिल्हयातील नागरीकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणुन सार्वजनिक जनतेस गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे इत्यादी बाबी टाळणे तसेच मानवी जिवीतास निर्माण झालेली भिती. नागरीकांचे व सार्वजनिक आरोग्याचे सुरक्षिततेकरिता काही प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हा प्रशासनाकडून मनाई आदेश पारीत करण्यात आलेले आहे.
चंद्रपूर जिल्हयातील नागरीकांस क्वारंटाईन व्यक्ती साठी देण्यात आलेल्या सुचनांच काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. जसे क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तीने क्वारंटाईन ठिकाणचा त्यांचा वावर सीमीत ठेऊन इतर व्यक्तीशी संपर्क टाळावा, अशा व्यक्तीने आपल्या गरजा कमीत-कमी ठेवाव्यात व नातेवाईकांना भेटू नये.
अशा व्यक्तीने पुर्णवेळ 24 तास मास्क घालुनच राहावे. वापरलेल्या मास्कची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, डिस्पोजेबल मास्कचा पुन्हा वापर करु नये.वापरलेला मास्क हा जंतु संसर्ग समजण्यात यावा.
क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीने आपले हात साबन व पाण्याने किवा अल्कोहोल युक्त हँन्ड सॅनिटायजर्सने वारंवार धुत राहावे. अशा व्यक्तीने खोकलतांना, शिकतांना योग्य ती काळजी, खबरदारी घ्यावी व टिश्यु पेपरचा वापर करावा.
कॉमन टॉयलेटचा वापर करतांना स्वच्छता राखावी व पहिली व्यक्ती टॉयलेट मधुन बाहेर आल्यानंतर लगेच आत जावू नये, अशा व्यक्तीने वापरलेले ताट, पाण्याचे ग्लास, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरुण व इतर दैनंदिन वापरातील वस्तु इतर
व्यक्तींना वापरण्यास देऊ नये, क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींमध्ये जर कोरोना सदृश्य आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्वरीत माहिती देऊन नजीकच्या शासकीय रुग्णालयात भरती व्हावे.अशा प्रकारच्या देण्यात आलेल्या सुचनांचे योग्य ते पालन करण्याबाबत आदेशाव्दारे सुचित करण्यात आलेले आहे.
चंद्रपूर जिल्हयात इतर जिल्हयातुन,परराज्यातुन छुप्या मार्गाने,अवैध रितीने दाखल होऊ नये आणि दाखल झालेले असल्यास संबधीत नागरीक यांनी जिल्ह्यात दाखल झाल्याबाबत योग्य ती सूचना प्रशासनास, पोलीस विभागास, आरोग्य यंत्रणेस देण्याची सर्वस्वी जबाबदारी संबधीत व्यक्तीची असेल.
सदर आदेशातील उपरोक्त सूचनाचे,आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधीतांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल. असा आदेश आज दिनांक 17 एप्रिल 2020 जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिला आहे.
00000
No comments:
Post a Comment