रोजगार मेळाव्यात 129 उमेदवारांची प्राथमिक निवड
चंद्रपूर दि. 29 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर, चंद्रपूर व राणी हिराई शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
राणी हिराई शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,बल्लारपूर येथे पार पडलेल्या या रोजगार मेळाव्यात 319 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी एकूण 129 उमेदवारांची मुलाखतीद्वारे प्राथमिक स्वरुपात निवड करण्यात आली.
मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक रुतूराज सुर्या, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजू नंदनवार, बल्लारपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजरत्न वानखडे, अप्रेन्टिशीप सल्लागार प्रणाली डहाट आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतूराज सुर्या यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली. सहायक आयुक्त भैय्याजी येरमे म्हणाले, आपल्या कौशल्याचा वापर रोजगार, स्वयंरोजगार मिळविण्यासाठी करावा. तसेच उद्योजकांनी जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध करुन द्यावी. बल्लारपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजरत्न वानखडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून कौशल्य प्राप्त करावे. बेरोजगार उमेदवारांनी मोठ्या शहराकडे वळून अधिकाधिक कौशल्य प्राप्त करुन घ्यावे व मोठे उद्योजक बनावे, असे सांगितले.
या रोजगार मेळाव्यात संसूर सृष्टी इंडिया प्रा. लि. चंद्रपूर, विदर्भ क्लिक सोल्युशन, एस.बी.आय.लाईफ इंन्शुरन्स, वैभव इंटरप्राईजेस नागपूर, मल्टीव्हेव पॉलिफायबर, चंद्रपूर आदी नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
०००००
No comments:
Post a Comment