Search This Blog

Sunday 10 May 2020

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर 42 दिवसांनी जिल्हाअंतर्गत एसटीचा प्रवास सुरु...




पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर 42 दिवसांनी
जिल्हाअंतर्गत एसटीचा प्रवास सुरु...
हैद्राबादला अडकलेल्या मजुरांना घेऊन एसटी तालुक्याला रवाना
चंद्रपूर,दि. 10 मे : चाळीस-बेचाळीस दिवसांच्या लॉकडाऊन नंतर आंध्रप्रदेश व तेलंगाना राज्यात अडकलेल्या मजुरांना जिल्ह्यातील विविध भागात घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाची पहिली बस चंद्रपूर आगारातून आज रवाना झाली. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा अंतर्गत बस सुरू करण्याची सूचना केल्यानंतर महामंडळाच्या बसेसची थांबलेली चाके गतिशील झाली.
तेलंगाना राज्यातून हैदराबाद येथून चंद्रपूर जिल्ह्यातील अडकलेल्या मजुरांना घेऊन त्या राज्याची बस आज चंद्रपूर एसटी स्टॅन्डला आली. त्यामुळे हैद्राबाद वरून चंद्रपूरला पोहोचलेल्या मजुरांना पुढे कसे जावे हा प्रश्न होता. पालकमंत्री कार्यालयाशी त्यांनी संपर्क साधल्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सूचना केली. त्यानंतर सिंदेवाही, नागभीड, मूल, ब्रह्मपुरी तालुक्यांच्या गावाला जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली. सोमवारपासून राज्य शासनाने मजुरांना एसटी बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रविवारीच हे मजूर चंद्रपूरमध्ये पोहचल्यामुळे 26 जणांच्या ताफ्याला मूल,सिदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी येथे रवाना करण्यात आले.
तत्पूर्वी, गेल्या अनेक दिवसांपासून आगारात जमा असलेल्या एसटी बसेसचे सॅनीटायझेशन करण्यात आले. तसेच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रवाशांना देखील आवश्यक वैद्यकीय सल्ला व शारीरिक अंतर राखण्याचे निर्देश दिले गेले. केवळ 26 नागरिकांना या बसमधून रवाना करण्यात आले.
          यावेळी प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी आगार व्यवस्थापक सचिन डफळे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक किरण नागापुरे, तहसीलदार निलेश गौंड, नगरसेवक नंदू नागरकर, प्रकाश देवतळे, प्रकाश तोळकर, शेखर उईके आदी उपस्थित होते. नगरसेवक नंदू नागरकर यांनी यावेळी या प्रवाशांची खानपाणाची व्यवस्था केली.
00000

No comments:

Post a Comment