शेतकऱ्यांना थेट बांधावर होणार कृषी निविष्ठांचा पुरवठा
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाचा पुढाकार
चंद्रपूर, दि. 30 मे: कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर जिल्हांमध्ये सध्या संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावर येऊन बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते आणि सोशल डिस्टसिंग न पाळले गेल्यामुळे कोरोना विषाणुंचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होवू शकतो त्यामुळे जसे शेतकरी गटांमार्फत भाजीपाल्याचा पुरवठा शहरांमध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने करण्यात आला त्याच धर्तीवर कृषि निविष्ठांचा पुरवठा कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचा समन्वय ठेवून करता येणार आहे. कृषि विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी ग्राम पातळीवर समन्वयक म्हणून काम करुन कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट यांचे माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे शेतावर कृषि निविष्ठांचा पुरवठा करणे शक्य होणार आहे,असे एका पत्रकाद्वारे आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्ट केले आहे.
अशी असणार कार्यवाही :
शेतकऱ्यांनी त्यांच्या भागात असलेल्या आणि त्यांना सोयीच्या गटांकडे आपली नोंदणी करावी. नोंदणी करतांना आत्मा अंतर्गत ज्या गटांची नोंदणी झालेली आहे.त्याच गटाकडे नोंदणी होईल असे पाहावे.त्यानिमित्ताने 100 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी कोणत्या ना कोणत्या गटाकडे करणे शक्य होईल.
शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, पत्ता, सर्वे नंबर,गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, त्यांना ज्या कृषि सेवा केंद्रामधुन निविष्ठा खरेदी करावयाच्या आहेत त्यांच्या नावासह, त्यांना खरीप हंगामामध्ये आवश्यक असणारे विविध पिकांचे बियाणे, खते, किटकनाशके यांची मागणी गटाकडे करावी.
कृषि विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी,कर्मचारी यांनी उत्पादक शेतकऱ्यांचे गट पिकनिहाय तयार करुन शेतकऱ्यांना गटाद्वारे आवश्यक बियाणे नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. ही सर्व कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांनी समन्वयक म्हणून करावी.
निविष्ठा नोंदणी गटाकडे झाल्यानंतर गटप्रमुखानेच बियाणे, खते,किटकनाशके खरेदी करावी.जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना विक्री केंद्रावर जावे लागणार नाही.
ज्या विक्रेत्यांना शक्य. आहे अशा विक्रेत्यांनी मोबाईल ॲप तयार करून शेतकऱ्यांची मागणी नोंदवून घ्यावी आणि मोठी मागणी असल्यास मागणीप्रमाणे बियाणे खते व किटकनाशके शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहच करावेत.
सेवा केंद्र ते शेतकरी गट या वाहतूकी करीता कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयक म्हणून काम करावे. या वाहतुकीकरीता आवश्यक असणारे परवाने कृषि विभागामार्फत गटांकरीता उपलब्ध करून द्यावेत.
मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक किंवा कृषि सहाय्यक यांचे मार्फत व्हिडिओ कॉलद्वारे शेतकरी आणि कृषि निविष्ठा विक्रेता यांचा समन्वय घडवून आणावा.जेणेकरुन सदर निविष्ठा खरेदी व्यवहारामध्ये पारदर्शकता राहून शेतकऱ्यांची फसवणुक होणार नाही. शेतकऱ्यांनी त्यांना हव्या असलेल्या आणि वाजवी दरामध्ये निविष्ठांचा पुरवठा करणाऱ्या निविष्ठा विक्रेत्याकडून निविष्ठा खरेदी करण्यासाठी नोंदणी करावी.
शेतकरी व निविष्ठा विक्रेता यामधील आर्थिक बाबी शेतकरी गटामार्फत पारदर्शक पद्धतीने हाताळण्यात याव्यात. कृषि विभागाच्या अधिकाऱ्याने या बाबी हाताळू नये.
निविष्ठा पुरवठ्याबाबत तालुका स्तरावर कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा व दि.31 मे 2020 पुर्वी अथवा पेरणी हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना सर्व निविष्ठांचा पुरवठा होईल असे पहावे.
00000
No comments:
Post a Comment