नागरिकांना अधिसुचित सेवा विहित वेळेत द्या - जिल्हाधिकारी वसुमना पंत
Ø जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘सेवा हक्क दिन’
चंद्रपूर, दि. 28 : महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य म्हणून ओळखले जाते. कल्याणकारी राज्यामध्ये शासनाच्या विविध सेवा वेळेत देण्याला प्राधान्य आहे आणि तो नागरिकांचा हक्क् सुध्दा आहे. त्यामुळे सर्व विभागांनी आपापल्या विभागाच्या अधिसुचित सेवा नागरिकांना विहित वेळेत द्याव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.
नियोजन सभागृह येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित सेवा हक्क दिन (28 एप्रिल) कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.
शासन आणि प्रशासन लोकांसाठी काम करते, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये, म्हणून जास्तीत जास्त सेवा ह्या ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र या सेवा ऑनलाईन असल्या तरी संबंधित अधिका-यांनी नागरिकांच्या तक्रारी वेळेत निकाली काढणे बंधनकारक आहे. शासन स्तरावरून दर महिन्याला याचा आढावा घेतला जातो. यात प्रत्येक जिल्ह्याची रँकिंग कळते. अर्ज निकाली काढण्याची शासकीय विभागांची गती कशी आहे, याचीसुध्दा पडताळणी केली जाते. त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा देणे आपले कर्तव्य आहे. लोकांना त्रास न होता सेवा मिळाल्या तर शासन-प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यास मदत होते, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर म्हणाल्या, पूर्वी सर्व सेवा ऑफलाईन होत्या. आता मात्र विविध विभागाच्या सेवा ऑनलाईन आहेत. प्रत्येक विभागाने 100 टक्के काम करून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार म्हणाले, 34 विभागाच्या एकूण 1212 सेवा ह्या ऑनलाईन असून 13 विभागाच्या 113 सेवा ह्या ऑफलाईन आहेत. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात आपल्या विभागाच्या अधिसुचित सेवांचा फलक लावणे आवश्यक आहे. तसेच प्रथम अपिलीय, द्वितीय अपिलीय अधिकारी कोण, याची माहिती सुद्धा लावावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा प्रकल्प प्रमुख विकास लालसरे यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी मानले.
नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप : यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना विविध सेवेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात लक्ष्मी झोडे, वैष्णवी गभणे, चंदा वैद्य यांना नवीन शिधापत्रिका प्रमाणपत्र, गोविंद सरकार यांना संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र तर वर्षा कोडापे, प्रतिक्षा चावरे, शुभांगी चवरे यांना पोलिस विभागाचे व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र देण्यात आले.
००००००
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment