8 ते 25 एप्रिल दरम्यान अमृतच्या लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षण
चंद्रपूर, दि. 08 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत संस्था आहे. ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवती व इतर उमेदवारांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी विविध प्रशिक्षण व उपक्रम आयोजन करून लाभ मिळवून देण्यात येतो.
सद्यस्थितीमध्ये अमृत संस्थेमार्फत लक्षित गटाच्या सर्वागीण उन्नतीसाठी विविध योजनाची अंमलबजावणी करण्यात येते. यात मुख्यत्वे 1. व्यक्तिमत्व विकास, 2. औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, 3. रोजगारक्षम कौशल्य विकास, 4. उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाह्य, 5. स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन, 6. वैयक्तिक व्याज परतावा योजना (उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी) इत्यादी योजनांचा समावेश आहे. यासाठी लक्षित गटातील कुटुंबाची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, उपलब्ध स्थानिक संसाधने, उपलब्ध कौशल्य व आवडीनुसार विविध योजना तयार करण्यासाठी लक्षित गटातील परिवाराचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाचा कालावधी 8 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 आहे.
या माध्यमातून लक्षित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमाची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्षित गटाशी संपर्क करणार आहेत. तरी लक्षित गटातील जास्तीत जास्त व्यक्तीनी नोंदणी करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक विक्रममोहन पांडे यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment