पुरामुळे झालेले नुकसान व केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा संदर्भात पालकमंत्र्यांकडून आढावा
चंद्रपूर दि. 15 सप्टेंबर: गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे ब्रह्मपुरी, सावली, पोंभुर्णा, मुल, गोंडपिपरी तालुक्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे ग्रामीण भागात व लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाचही तालुक्यातील 75 गावे बाधित झाली. तर 5 हजार 480 कुटुंब बाधित झाले आहे. त्यामुळे योग्य ती मदत देण्यासाठी राहिलेल्या तालुक्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल लवकरात लवकर सादर करावा, अशा सूचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्यात.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रू. वायाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
पूरपरिस्थितीमुळे शेत पिकांचे, जमिनीचे, बांधबंधिस्तीचे तसेच घरे, गोठ्यांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. लहान मोठी दुधाळ जनावरे आदींचेही नुकसान झाले आहे. त्यासोबतच पुरात बुडालेली घरे काही काळाने पडतात. अशा सर्वच बाबींची सुद्धा नोंद घ्यावी. तसेच किरकोळ व्यवसायिक, मत्स्यव्यावसायिक यांचे झालेल्या नुकसानीचे सुद्धा पंचनामे करावेत. आपला जिल्हा मागे राहता कामा नये. त्यामुळे सर्व पूरग्रस्त तालुक्यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल लवकर सादर करण्याचा सूचना श्री. वडेट्टीवार यांनी दिल्यात.
यासोबतच सार्वजनिक मालमत्तेचे पुल, रस्तेदुरुस्ती, जलसंपदा विभागाच्या क्षतीग्रस्त सरंचना, महावितरणचे झालेले नुकसान आणि त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी मागणीचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्यात.
00000
No comments:
Post a Comment